बुलेट ट्रेन राहू द्या, लोकल ट्रेनकडे लक्ष द्या - संजय निरुपम
आज सकाळी एल्फिस्टन रोड - परेल स्टेशनवर जी घटना घडली ती अत्यंतदुःखदायक आणि क्लेशदायक आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये २२ मुंबईकर मृत्युमुखी पडले त्यांना मी मनापासून श्रद्धांजली वाहतो आणि जे ३६ मुंबईकर जखमी झालेले आहेत ते लवकरात लवकर चांगले व्हावेत यासाठी मी अंबेमातेकडे प्रार्थना करतो, अशी भावना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले कि हि राजकारण करण्याची वेळ नाही आहे परंतु काही प्रश्न उपस्थित हे होतातच. खरंच आपल्याला १ लाख करोड रुपये खर्च करून बुलेट ट्रेन आणण्याची गरज आहे का ? त्यापेक्षा सरकारने लोकल ट्रेनच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्यायला नको का ? शिवसेना भाजपा सरकार येऊन साडे तीन वर्षे झाली पण हे सरकार स्टेशनची नावे बदलण्यामध्ये व्यस्त आहेत, परंतु लोकल ट्रेन, रेल्वे स्टेशन आणि स्टेशनवरील ब्रिज यांच्या पायाभूत सुविधांकडे सरकारचे लक्ष नाही. मुंबईतील काही रेल्वे स्टेशन्सना १०० वर्षे पूर्ण झालेली आहेत त्यांच्याकडे खरंच गांभीर्याने बघण्याची गरज आहे. सर्व स्टेशनचा सर्वांगीण विकास केला पाहिजे. सरकारकडे पैशाची कमतरता नाही आहे, ४५ हजार करोडचे बजेट आहे. परंतु शिवसेना भाजपा सरकारची इच्छाशक्ती आणि चांगले काम करण्याचा दृष्टिकोन नाही, जिद्द नाही आहे, म्हणून मी म्हणतो आहेबुलेट ट्रेन राहू द्या, लोकल ट्रेनकडे लक्ष द्या.
संजय निरुपम पुढे म्हणाले कि पूर्व रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे फक्त ट्विटरवर बोलतात, ते ट्विटर मंत्री होते. त्यांनी काहीच काम केलेले नाही. सर्व सामान्य नागरिकांनी त्यांच्याकडे व रेल्वे प्रशासनाकडे अनेक तक्रारी केल्या होत्या पण त्यांनी दुर्लक्षच केले.
एल्फिस्टन रोड - परेल स्टेशनवरील ब्रिज आणि त्यावर होणारी प्रचंड गर्दी याबाबत हि तक्रारी केल्या होत्या परंतु रेल्वे मंत्री आणि रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केले म्हणून हि दुर्दैवी घटना घडलेली आहे. नवनिर्वाचित रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या बद्दल मी काहीच बोलणार नाही कारण ते आत्ताच मंत्री झालेले आहेत, पण त्यांच्याकडून माझी अशी अपेक्षा आहे कि ते स्वतः मुंबईकर आहेत तेव्हा त्यांनी मुंबईकरांच्या समस्या जाणून घेऊन मुंबईतील सर्व स्टेशनचा सर्वांगीण विकास ताबडतोब करावा म्हणजे भविष्यात अशा घटना घडणार नाहीत.
शिवसेना व भाजपा सरकार हे सर्व सामान्य जनतेला गृहीत धरत आहेत. जनतेसाठी हे सरकार काहीच करत नाही आहे. मुंबईकरांना मूलभूत सोयीसुविधा हे सरकार देऊ शकत नाही आहे. मुंबईकरांच्या समस्या सोडविण्यात हे सरकार अपयशी ठरलेली आहे. आजच्या दुर्दैवी घटनेला सरकार आणि रेल्वे प्रशासन संपूर्णतः जबाबदार आहे. फक्त चौकशी करून समिती नेमून आणि मृत व्यक्तींना भरपाई देऊन हा प्रश्न सुटणार नाही आहे. मुंबईतील सर्व समस्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन त्या द्दृष्टीने ताबडतोब ठोस पावले उचलली पाहिजे, अशी आमची मागणी आहे, असे संजय निरुपम म्हणाले.
आज दुपारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, आमदार भाई जगताप व माजी खासदार मिलिंद देवरा आणि काही काँग्रेसचे नेते यांनी केईएम रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली.

Post a Comment